आपल्या देशाच्या विकास उद्दिष्टांमध्ये योगदान देण्याच्या नावाखाली कामगारांनी दर आठवड्यात 70तास किंवा अगदी 90तास काम करायला हवे,असे अलीकडेच काही प्रसिद्ध उद्योग प्रमुख म्हणाले. आठवड्यातून एक दिवस विश्रांतीसह दर दिवशी 8तास काम असा कायदा आहे या वस्तुस्थितीकडे ते दुर्लक्ष करत आहेत. अशा वल्गना भांडवलदारांना करू न देणे हे महत्त्वाचे आहे. हिंदुस्थानातील कामगार वर्गाने ज्या संघर्षातून हा कायदा प्रस्थापित करायला लावला त्या इतिहासाची आठवण या प्रसंगी करून देणे आवश्यक आहे.
10जून 1890 हा दिवस मुंबईतील गिरणी कामगारांसाठी ऐतिहासिक विजयाचा दिवस होता. त्यांनी दर आठवड्यात एक दिवस सुट्टीची मागणी मान्य करण्यास गिरणी मालक संघटनेला भाग पाडले होते. रविवारी आठवड्याची सुट्टी अधिकृतपणे मंजूर करण्यात आली. 1884पासून कामगारांनी सातत्याने केलेल्या संघर्षाचा हा परिणाम होता.
तोपर्यंत, हिंदुस्थानातील कामगार आठवड्याचे सातही दिवस काम करत असत. त्या काळातील फॅक्टरी इन्स्पेक्टरच्या अहवालांनुसार, कामगार जेवणाचीही सुट्टी न घेता दिवसातून 15तासांपेक्षा जास्त वेळ काम करत असत.बहुतेकदा काम करता करताच कारखान्यातच ते जेवत. गिरण्यात खूपच दाटीवाटी असे आणि हवा खेळती ठेवण्याची व्यवस्था चांगली नसल्यामुळे गुदमरल्यासारखे होत असे. ते आठवड्यातील सातही दिवस काहीही विश्रांती न घेता 15तास विश्रांतीशिवाय काम करत.
1884मध्ये कामाच्या चांगल्या परिस्थितीसाठीचा संघर्ष तीव्र होऊ लागला. 1851-61च्या दशकात, मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या झपाट्याने वाढली. 1871-72आणि 1876-77च्या तीव्र दुष्काळामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. 1871पर्यंत, 10गिरण्यांमध्ये 8,000हून अधिक कामगार काम करत होते. पुढील 25वर्षांत, कामगारांची संख्या 71गिरण्यांमध्ये 78,000 इतकी वाढली.
पण या कामगारांसाठी जीवन मात्र खूपच हलाखीचे होते. अत्यंत कष्टप्रद अशा या परिस्थितीत साप्ताहिक सुट्टीसाठी कामगारांनी 1884मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आवाज उठवण्यास सुरुवात केली. गिरणी मालकांनी ही मागणी फेटाळून लावली. कामगार आधीच सणांच्या काळात सुट्टी घेतात आणि महिला मासिक पाळीच्या वेळी रजा घेतात असे गिरणी मालकांचे म्हणणे होते. परंतु कामगारांनी त्यांचा हा संघर्ष थांबविण्यास नकार दिला. कामगारांनी केलेल्या दीर्घ आणि अथक संघर्षामुळे, देशातील पहिल्या क्रमांकाच्या औद्योगिक शहरात साप्ताहिक सुट्टी मंजूर करण्यात आली.
ही एक कठीण लढाई होती पण विजय त्यांचा झाला! विश्रांतीचा अधिकार हा कामगारांनी धैर्याने, त्यागाने आणि संघर्षाने मिळवला आहे याचीच आठवण मुंबईच्या गिरणी कामगारांनी या कष्टाने मिळवलेल्या विजयाने होते. साप्ताहिक सुट्टी हा आपल्याला कोणीतरी दिलेली एक सवलत नाही तर कठोर संघर्ष करून जिंकलेला अधिकार आहे.
1946 मध्ये, 1934च्या कारखाना कायद्यात दुरुस्ती करून हिंदुस्थानात 8तासांचा कामाचा दिवस असा कायदा करण्यात आला. तथापि, या दुरुस्तीनंतरही, भांडवलदार वर्ग मात्र कामगारांना जास्त तास काम करायला लावण्याचा प्रयत्न कधीही सोडत नाही.
ज्या उद्योगांचा ‘कारखाना कायद्यात’ समावेश नाही, त्यांना विशिष्ट राज्याचा ‘दुकाने आणि आस्थापना कायदा’ लागू होतो. आयटी आणि तत्सम सेवा क्षेत्रे या कायद्यातूनही सूट मागतात. या क्षेत्रातील कामगार दिवसातून 12तासांपेक्षा जास्त काम करतात हे सर्वज्ञात आहे. सेवा उद्योगात हा एक सामान्य नियमच बनला आहे. आपल्या देशात मोठ्या संख्येने बेरोजगारी असल्याने, ज्यांच्याकडे नोकरी आहे त्यांना मालक पूर्णपणे पिळून घेतात.
आज, या कष्टाने मिळवलेल्या हक्कांवर भांडवलदार वर्गाचे सरकार क्रूर हल्ला करत आहे. भांडवलदार वर्ग प्रत्येक उद्योगातील कामगारांना “राष्ट्र उभारणी”साठी दिवसाचे 14तास आणि आठवड्याचे सातही दिवस काम करण्याचे आवाहन करत आहे. त्यांना जास्तीत जास्त नफा मिळविण्यासाठी कामगारांचे शोषण तीव्र करण्याचा अधिकार हवा आहे. कामगारांनी एक शतकाहून अधिक काळापूर्वी मिळवलेला अधिकार भांडवलदारांना हिरावून घ्यायचा आहे. आठ तासांच्या कामाच्या दिवसाच्या अधिकारावर भांडवलदार वर्गाच्या या हल्ल्याचा कामगारांनी एकजुटीने प्रतिकार केला पाहिजे.
आंतरराष्ट्रीय संदर्भ
आंतरराष्ट्रीय पातळीवर, 1820आणि 1830च्या दशकात कामाचे तास कमी करण्यासाठी सातत्याने अनेक संप झाले. ब्रिटन, अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये कारखाना व्यवस्थेच्या सुरुवातीपासूनच हा संघर्ष सुरू झाला होता. कामगार 14-१६-18तासांच्या दीर्घ कामाच्या दिवसाला विरोध करत होते. इंग्लंडमध्ये, कामगार आणि भांडवलदारांमध्ये कामाच्या दिवसाच्या लांबीवरून तीव्र संघर्ष सुरू होता. 1847मध्ये ब्रिटिश संसदेने कामाचा दिवस 10तासांपर्यंत मर्यादित करणारा कारखाना कायदा मंजूर करणे हा कामगार वर्गासाठी एक महत्त्वाचा विजय होता.
कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगेल्स यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने 1866मध्ये जिनिव्हा काँग्रेसमध्ये सर्व देशांतील कामगारांना आठ तास कामाच्या दिवसासाठी लढण्याचे आवाहन केले.
1मे 1886रोजी, सुमारे दोन लाख कामगारांनी आपली कामाची अवजारे खाली ठेवली आणि अमेरिकेतील शिकागो येथील मिशिगन अव्हेन्यूवर मोर्चा काढला. त्या दिवसापासून त्यांनी दिलेला नारा “आठ तास काम, आठ तास विश्रांती, आठ तास मनोरंजन”हा जगभरातील कामगारांचा नारा झाला. संपाचे केंद्र शिकागो हे शहर होते, जिथे संप चळवळ सर्वात जास्त पसरली होती, परंतु इतर अनेक शहरे देखील एक मे रोजी झालेल्या संघर्षात सहभागी झाली होती. न्यूयॉर्क, बाल्टीमोर, वॉशिंग्टन, मिलवॉकी, सिनसिनाटी, सेंट लुईस, पिट्सबर्ग, डेट्रॉईट आणि इतर अनेक शहरांमध्ये कामगारांनी मोठ्या संख्येने संपात भाग घेतला.
तीन वर्षांनंतर, पॅरिस कामगार काँग्रेसने आठ तासांचा दिवस कायदेशीररित्या लागू करण्याची मागणी केली आणि 1890मध्ये 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून घोषित करण्यात आला.
